अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
मुरुड तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांचे, शेतजमिनींचे आणि दैनंदिन उपजीविकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..अशा संकटाच्या काळात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मुरुड तालुका चिटणीस विजय कृष्णा गिदी यांनी मुरुड तहसीलदारांना निवेदन सादर करून नुकसानग्रस्त ग्रामस्थांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.
25-26 मे 2025रोजी झालेल्या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांची छपरे उडाली, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले,घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उध्वस्त झाले आहेत.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना शासनाकडून तत्काळ मदतीची गरज आहे.मुरुड तालुका चिटणीस विजय गिदी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा.तसेच भविष्यात अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी यंत्रणा सक्षम करण्यात याव्यात.
शेतकरी कामगार पक्षाने नेहमीच जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे.या संकटसमयी पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून हा लढा मदतीसाठी नाही तर न्यायासाठी आहे,असे मुरुड तालुका चिटणीस विजय गिदी यांनी स्पष्ट केले आहे…