रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा शहरातील साईमल्हार चौक ते नगरपालिका व वीर सावरकर या रस्त्याची गेल्या १० वर्षांपासून रोहेकरांना प्रतीक्षा होती…शेवटी २०२५ मध्ये प्रशासकीय राजवटीत या भागात रस्ता झाला…हा रस्ता रोहेकरांसाठी मध्यवर्ती,रहदारीचा व लोकांसाठी त्यांच्या विकासाचा,तालुक्याशी जोडणारा दुवा आहे.पण दुर्दैव म्हणजे केवळ १० दिवसांतच या रस्त्याची स्वप्ने मातीमोल झाली.पावसाच्या पहिल्याच सरींमध्ये रस्ता वाहून गेला आणि रोहेकरांना पुन्हा जुन्या हालअपेष्टा नशीबी आल्या. रविवारी, २५ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हा नव्याने बांधलेला रस्ता जागोजागी उधळण्यास सुरुवात झाली. अजून काही पावसाच्या सरी आल्या तर हा संपूर्ण रस्ता नष्ट होईल,अशी भीती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.जसा राजाचा जीव पोपटात असतो, तसाच काही जणांचा जीव नगरपालिकेच्या ठेक्यात आहे. त्यामुळे भरपावसात केलेल्या रोह्यातल्या डांबरीकरण रस्त्यांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे. त्यात कर भरणाऱ्या लोकांचे पैसे आहेत. यामुळे रोह्यातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रस्त्याच्या बांधकामासाठी रोहा नगर पालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा प्रत्यक्ष रस्ता बांधकामाला सुरुवात झाली, तेव्हा अनेक नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेबाबत मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.त्यांचे हे काम निकृष्ट दर्जाचे असून,त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट केले होते.परंतु या तक्रारींकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आले..परिणामी,पहिल्याच पावसात रस्ता उधळू लागला.नागरिकांच्या म्हणण्यानुसार,“हा केवळ निकृष्ट कामाचा प्रश्न नाही. हा विकास निधीचा अपहार आहे. नागरिकांच्या मुलभूत हक्कावर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.