रायगडावर शिवराज्याभिषेकाचा जल्लोष…

0
8

महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):- 

६ जूनचा शिवराज्याभिषेक वैचारिक क्रांती करणारा सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज ३५२ वा श्री. शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा करण्यात आला… ह्याच देही हाची डोळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली होती… पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणात ढोल, ताशे, नगारे आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले शिवभक्त यामुळे रायगडावर शिवकाळ जागा झाला…

किल्ले रायगडावर ६ जून रोजी ३५२ वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला… गेली दोन दिवस किल्ले रायगडावर पारंपारिक मर्दानी खेळ, पोवाडे, जागरण, गोंधळ, आणि ढोल ताशे नगारे यांच्या आवाजाने शिवकाळ जागा झाला होता. श्री. शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्ष रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षी देखील समितीने अत्यंत नियोजनबद्ध असे दिमागदार सोहळ्याचे आयोजन केले. यामुळे संपूर्ण रायगड छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

शिवराज्याभिषेक गीताने या सोहळ्याची सुरुवात झाली. विधिवत पूजा केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध नद्यांच्या आणलेल्या जलाने अभिषेक करण्यात आला. यावेळी संभाजी राजे भोसले आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे भोसले हे उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील आमदार संजय गायकवाड, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह विविध शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते… युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पालखीचे आगमन राजसदरेवर झाले. राज सदरेवरील उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला… येथील छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी लाखो शिवभक्तांना मार्गदर्शन करताना संभाजी राजे भोसले यांनी हा शिवराज्याभिषेक म्हणजे वैचारिक क्रांतीचा सोहळा असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचा विचार भावी पिढीला देण्यासाठी शिक्षणाची गरज असल्याचे सांगून या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये महाराजांच्या विषयावरील अभ्यासक्रम असणे गरजेचे असल्याचे सांगितले. छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न होत नसल्याची खंत व्यक्त करत शासनाने हे गड किल्ले आमच्या ताब्यात द्यावेत या गडकिल्ल्यांचे जतन करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो असे स्पष्ट केले. शासनाने हा सोहळा राष्ट्रीय दिन म्हणून देखील साजरा केला पाहिजे असे सांगितले.