रोहा शिवसत्ता टाइम्स (समीर बामुगडे ):-
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट कंपनीच्या रिकाम्या प्लॉट मधून मोठ्या प्रमाणात काळ्या रंगाचे केमिकलयुक्त सांडपाणी सार्वजनिक नाल्याद्वारे नदीत सोडले जात आहे.त्यामुळे कुंडलिका नदी प्रदूषित झाली आहे…प्रदूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रोठ बुद्रुक शाखा प्रमुख निलेश वारंगे यांनी जोरदार आवाज उठवला असून प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.कंपनीवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…
एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.भर दिवसा मोठ्या प्रमाणात भिंती मधून सांडपाणी गटाराद्वारे नदीमध्ये सोडले जात आहे…घातक केमिकलचे हे पाणी कोणत्या कंपनीचे आहे?हे शोधण्याचे धाडस प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीचे अधिकारी दाखवत नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे…मोठ्या प्रमाणात काही कंपन्या सार्वजनिक नाल्याद्वारे कुंडलिका नदीत केमिकलयुक्त सांडपाणी सोडत आहेत.त्यामुळे नदीतील जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत…नागरिकांच्या अंगाला खाज सूटत असून त्वचारोग होण्याची शक्यता वाढली आहे.मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित झाली आहे…प्रदूषण थांबवण्याची मागणी निलेश वारंगे यांनी केली आहे.
दिपक नायट्रेट कंपनीच्या प्लॉटमधील भिंती मागे दडलंय काय? कोणा-कोणाचे हात ह्या पाण्याने काळे झाले आहेत? अधिकारी या पाण्याचा शोध का घेत नाहीत?प्रदूषण नियंत्रण मंडळाने भिंत फोडून जगा समोर सत्य आणावे अशी भूमिका निलेश वारंगे यांनी व्यक्त केली आहे.
गेले काही महिने या भल्यामोठ्या भिंतीच्या आतून केमिकलचे पाणी सोडले जात आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून हे पाणी शोधण्याचा प्रयत्न दीपक नायट्रेट कंपनीने न केल्याने या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. कंपनीने स्वतःने भिंत फोडून तेथून येणारे घातक केमिकलयुक्त सांडपाणी बंद करण्याचे सौजन्य दाखवावे असे ही निलेश वारंगे म्हणाले.
रोहा शहराच्या मध्यातून वाहणारी आणि एकेकाळी स्वच्छ जलप्रवाह म्हणून ओळखली जाणारी कुंडलिका नदी केमिकलयुक्त पाण्याने भयावह रूपात दिसून येत असून नदी प्रदूषित झाली आहे. पावसाळी मासे, कासव,जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यांच्या उपजिविकेचे नैसर्गिक साधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
दीपक नायट्रेट कंपनीच्या प्लॉटमधून येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्याचा शोध घेऊन नदी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी निलेश वारंगे यांनी केली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणती कारवाई करणार याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे.