रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
उरण येथे १९ जून, २०२५ रोजी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात शेलघर येथे झालेली जिल्हास्तरीय काँग्रेस बैठक पूर्णतः अपयशी ठरली. संपूर्ण जिल्ह्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत १६ तालुकाध्यक्षांपैकी केवळ २ ते तीनच उपस्थित होते, तर अनेक वरिष्ठ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बैठकीचा स्पष्ट बहिष्कार केला. या घटनेमुळे महेंद्र घरत यांचे नेतृत्व व काँग्रेसचे जिल्हास्तरीय संघटन दोन्ही धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव व कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. वेंकटेश आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव राजेश शर्मा तथा कोकण प्रभारी यांची उपस्थिती असूनही बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नाही. उरणच्या स्थानिक कार्यकर्त्यांखेरीज जिल्ह्यातील इतर कुठल्याच भागातून लक्षणीय उपस्थिती नव्हती. एकूण हजेरी नोंदवलेल्या स्वाक्षऱ्या जेमतेम 100 ते १२० इतक्याच होत्या, त्या देखील मंचावरील पाहुणे व निरीक्षक धरून.
सर्वात गंभीर बाब म्हणजे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत स्वतः या बैठकीला गैरहजर राहिले. त्यांच्या नेतृत्वावर आधीपासूनच नाराजी असलेले कार्यकर्ते यामुळे अधिकच संतप्त झाले. मध्य व दक्षिण रायगडमध्ये त्यांची पूर्ण निष्क्रियता व संवादाचा अभाव यामुळे या भागातील कार्यकर्त्यांनी बैठक पूर्णतः बहिष्कृत केल्याचे स्पष्ट झाले.
मूळ बैठक १९ जून रोजी अलिबाग येथे आयोजित होती. मात्र, अल्प सूचना देतच अचानक उरण येथे बैठक स्थलांतरित करण्यात आली. या निर्णयामुळे मध्य आणि दक्षिण रायगडमधील तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम व नाराजी पसरली. जर ही बैठक मध्यवर्ती रायगडमध्ये आयोजित केली असती, तर सर्वांना येणे अधिक सुलभ झाले असते व व्यापक उपस्थिती मिळाली असती. परंतु तसे न झाल्यामुळेच बैठकीबाबत गोंधळ, संभ्रम आणि निराशाजनक उपस्थिती निर्माण झाली, इतकेच नव्हे तर निरीक्षक उपस्थित असूनही बैठक पूर्णतः अपयशी ठरली.
या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचाही नियोजनात्मक अपयश समोर आले आहे. रायगडसारख्या विस्तृत भौगोलिक परिसरात बैठक आयोजण्याचे दूरदृष्टीहीन धोरण, आणि जिल्हा नेतृत्वाची अकार्यक्षमता — या दोन्ही घटकांनी काँग्रेसचे स्थान अधिकच कमकुवत केले आहे.
या बैठकीने केवळ महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाचे अपयशच अधोरेखित केले नाही, तर रायगडमधील काँग्रेस संघटनेच्या ढासळलेल्या स्थितीवरही शिक्कामोर्तब केले. जिल्ह्याचे नेतृत्व बदलण्याची गरज आता पक्षातील कार्यकर्त्यांपासून निरीक्षकांपर्यंत सर्वांनाच प्रकर्षाने जाणवू लागली आहे.