जुन्या वादातून मित्राकडूनच जिवलग मित्राची हत्या… धारधार शस्त्राने केले वार… पोलिसांकडून अटक…

0
9

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

जुन्या वादातून झालेल्या भांडणात सुरेश दुनू होनहागा( वय २० वर्षे,रा.नवी मुंबई) याने आपल्या मित्र संजय प्रकाश बेहरा (वय २२ वर्षे, नवी मुंबई.) याच्या गळ्यावर कुठल्यातरी हत्याराने वार करून त्याची हत्या केल्याची घटना घटना  दि. १६/०६/२०२५ रोजी बावकुळेश्वर मंदिराच्या पाठीमागील डोंगरातील जंगलाच्या धबधब्याच्या खाली घडली.याबाबतची फिर्याद संजय बेहरा याची बहीण मनिषा राहुल केतवाल (वय १९ वर्षे,  रा. पनवेल) यांनी तुर्भे पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मृत संजय प्रकाश बेहरा ( वय २२) व त्याची हत्या करणारा आरोपी सुरेश दुनू होनहागा ( वय २०) हे दोघेही महापे येथील आजवानी कॉरीजवळ राहण्यास असून दोघेही मित्र आहेत.सोमवारी १६/०६/२०२५ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या हे दोघे मित्र पावसाळ्यामुळे तुर्भे एमआयडीसीतील डोंगराळ तयार झालेल्या धबधब्याच्या ओढ्यामधील खेकडे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी या दोघांमध्ये जुन्या कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर आरोपी सुरेश याने संजयच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले. यात संजय गंभीर जखमी होऊन त्याच ठिकाणी पडल्यानंतर सुरेशने त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निघृणपणे हत्या केली. त्यानंतर काहीही झाले नसल्याचे भासवत तो रात्री झोपी गेला. दरम्यान, सुरेश आणि संजय या दोघांना सोबत जाताना त्याच्या कुटुंबीयांनी पाहिले होते, त्यामुळे या हत्या प्रकरणात आपले नाव उघड होईल. त्यानंतर पोलिस आपल्याला पकडतील अशी भीती सुरेशच्या मनामध्ये निर्माण झाली. त्‍यामुळे त्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून संजयची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यासोबत तुर्भे एमआयडीसीतील डोंगराळ भागात जाऊन मृत संजयचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी सुरेश विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
याबाबत अधिक तपास तुर्भे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निलेश कोंडाळकर करीत आहेत..