नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंखे):-
नेरळमध्ये स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने होणारी ग्रामसभा ग्रामसेवकाने जाणूनबुजून १५ ऑगस्टऐवजी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ठेवली, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रविवारी १७ तारखेला सभा घेतली असती तर कोरम पूर्ण झाला असता, मात्र ग्रामसेवकाने मुद्दाम तारीख बदलून ग्रामसभाच कोलमडवली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
सभेला शंभरहून कमी नागरिक उपस्थित राहिल्याने ग्रामसभा तहकूब झाली. यामुळे पाणीटंचाई, वीजपुरवठा, गावातील घाणीचा प्रश्न तसेच भटक्या कुत्र्यांचा त्रास या सर्वच गंभीर समस्या ग्रामस्थांसमोर अनुत्तरीत राहिल्या आहेत. ग्रामसभेची तारीख बदलून ग्रामस्थांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार संताप व्यक्त केला आहे.