अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):
अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील गावांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. डावली रांजणखार, रेवस, सारळ, मिळकत खार, बोडणी या गावात नळाला आठवड्यातून कधीतरी पाणी येते. गावातील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत खारट झाले आहेत. पर्यायी व्यवस्था नसल्याने पिण्यासाठी विकतचे पाणी घेण्याची वेळ या गावातील नागरिकांवर आली आहे…आतापर्यंत पाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला परंतु या योजना कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे पाणी टंचाईचा फटका इथल्या नागरिकांना बसतो आहे. गेली अनेक वर्षे खारेपाटातील गावांना रेवस झोन 1 आणि रेवस झोन 2 या दोन स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवले जाते मात्र ही गावे योजनेच्या शेवटच्या टोकावर असल्याने या गावांपर्यंत पाणी पोहोचतच नाही…मार्च महिन्यापासूनच या गावांना टंचाईच्या तीव्र झळा लागायला सुरूवात होते. अधून मधून टँकर पाठवून प्रशासनातर्फे या गावांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही टँकरचे पाणी खूपच अपुरे ठरते मग विकतचे पाणी घेवूनच तहान भागवण्याची वेळ येते. पावसाळा सुरू झाला की टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद होतो.
धो धो पाऊस पडूनदेखील या भागातील गावाना भर पावसात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. सर्व गावे खाडीच्या किनारी असल्याने तेथील विहिरी, तळी, बोअरवेल यांना खारे पाणी लागते. ते पिण्यायोग्य नसते. त्यामुळे विकतचे पाणी घेतल्याशिवाय पर्याय नसतो. सध्या 15 लीटरच्या बरणीला 20 रूपये मोजावे लागतात. त्यामुळे इथले नागरीक हैराण झाले आहेत. गावातील नळकोंडाळी कोरडी पडली आहेत. गावातील महिला एकतर पाण्याच्या शोधात असतात किंवा नळाजवळ भांडी ठेवून पाणी कधी येतंय याची वाट पहात बसतात. याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होताना दिसतो.या भागात राबवण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजना जुन्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे सर्व योजना नव्याने कार्यान्वीत करण्याची गरज आहे. अडीच वर्षांपूर्वी डावली रांजणखार गावासाठी कामासाठी सव्वाकोटी रूपयांची जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली. परंतु अद्याप या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला आहे.