रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
कोकणच्या हापूस आंब्याचा रंग, सुगंध आणि अविट गोडी आणि चवीची भुरळ संपूर्ण जगातील खवय्यांना आहे. फळांचा राजा असलेल्या याच आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे.खवय्यांना आनंदाची बातमी असून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या रोहा वर्हाटी येथील बागायती मधील पहिला हापूस आणि केशर जातीच्या आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबई बाजारात मंगळवारी दाखल होणार आहेत. हापूसच्या 4 पेट्या आणि केशर जातीच्या 1 पेटी वाशी बाजारात मंगळवारी दाखल होणार आहेत. डझनाला पाच हजार रुपये दर मिळेल अशी माहिती आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी दिली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही रायगडाच्या हापूस आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले मानकरी ठरले आहेत. बागायती मधून काढलेल्या आंब्याची कुटुंबाने मनोभावे पूजा करून आंबा पेट्या बाजारात रवाना केल्या आहेत.रायगड जिल्ह्यात देखील हापूस आंब्याचे पीक भरघोस व मोठ्या प्रमाणावर येते. अलिबाग, रोहा, पेण, श्रीवर्धन, म्हसळा आदी तालुक्यात हापूस आंब्याचे पीक चांगले मिळते. रायगडच्या हापूस आंब्याची गुणवत्ता व चव अप्रतिम असल्याने येथील आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे.
तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील हे बाजारात आंब्याची पहिली पेटी नेण्यात अग्रगण्य ठरले आहेत. तब्बल 45 एकर जागेवर त्यांनी आंबा बागायत केली असून वर्षभर केलेल्या मेहनतीचे गोड फळ त्यांना जानेवारी पासून मिळायला सुरवात होते. दरवर्षी आपल्या बागेतून किमान 40 हजार डझन आंबे ते बाजारात नेतात, यावर्षीची पहिली आंबा पेटी बाजारात नेण्याचा बहुमान पुन्हा वरुण पाटील यांना मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याचा सुगंध विशिष्ट असतो, तर इतर आंब्याच्या तुलनेत हापूस चा गोडवा अधिक असतो. हवामानातील बदल व बदलत्या वातावरणात ही जानेवारी महिन्यात आंबा पेटी बाजारात पाठवणे ही मोठी गोष्ट आहे, याकामी मला माझे कुटुंब, हितचिंतक व मित्रपरिवार यांचे मदतकार्य होत असल्याचे वरुण पाटील यांनी सांगितले…