नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
संत निरंकारी मिशनच्यावतीने निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीतून प्रेरणा घेत त्यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून 23 फेब्रुवारी रोजी परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली “प्रोजेक्ट अमृतचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला…ज्या अंतर्गत स्वच्छ जल,स्वच्छ मन हे अभियान राबवून देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 900 शहरांमध्ये 1600 पेक्षाही अधिक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली…
उल्लेखनीय बाब म्हणजे सन 2023 मध्ये भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाच्या सहयोगाने “प्रोजेक्ट अमृत”चा शुभारंभ करण्यात आला होता. याचा उद्देश केवळ जलस्रोतांची स्वच्छता करणे एवढाच नसून जल संरक्षण हे मानवी जीवनाचे अभिन्न अंग बनविण्याचा विचार जनमानसामध्ये रुजविणे हा देखील आहे… नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील सेक्टर 12 ई मधील खैराणे गाव तलावाची स्वच्छता करण्यासाठी आज निरंकारी मिशनच्या शेकडो भक्तगण व सेवादल स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि सकाळी 7 ते 10 या वेळात हे स्वच्छता अभियान राबविले असून या अभियानाला नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता साहित्य पुरविण्यापासून ते निघणाऱ्या कचऱ्याचे निष्कासन करण्यापर्यंत सर्व प्रकारचे सहकार्य केले आहे.महाराष्ट्राचे माननीय वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी या अभियानाला आवर्जून भेट दिली असून संत निरंकारी मिशनच्या मानव कल्याणाच्या कार्याचे कौतुक केले…या अभियाना अंतर्गत आज मुंबई महानगर प्रदेशातील अनेक चौपाट्या, समुद्र किनारे, तलाव नदीकिनारे यांची स्वच्छता करण्यात आली.या अभियानाचे यापूर्वीचे दोन्ही टप्पे यशस्वी ठरले असून तिसरा टप्पा अधिक व्यापक, प्रभावशाली व दूरगामी परिणाम करणारा ठरत आहे.