जलजीवन योजना फक्त कागदावरच प्रशासनाचे फक्त आश्वासन… धनदांडगे, उद्योगपतींच्या बंगल्यांना मुसळधार पाणी…

0
27

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (ओमकार नागावकर):- 

रांजणखार-डावली हे गाव अलिबाग तालुक्यातील शेवटचे टोक असून गेले कित्येक वर्षे पाण्यापासून वंचित राहिले आहे. वारंवार प्रशासनाला निवेदने व प्रत्यक्ष भेटी देऊनही पाण्याचा प्रश्न अद्याप पर्यंत सुटलेला नाही व ही गावे पाण्यापासून आजपर्यंत वंचितच राहिली आहेत…त्यासाठीच आज दि.०३ मार्च रोजी जिल्हाधिकार्यालय अलिबाग येथे ग्रामस्थांच्या वतीने सर्व पक्षीय जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात आला.

रांजणखार-डावली ग्रामस्थांचा पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दि. ३१ जाने २०२२ रोजी जलजिवन मिशन योजना मंजूर केली परंतु त्या योजनेचे पाणी गावात पाहोचले नाही. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून गावात एक थेंब ही पाणी गावात पोहोचले नाही. त्या योजनेसंदर्भात प्रशासनाकडून किती दिवसात पाणी मिळेल याबाबत कोणतीही शाशवती नाही. सदर ठेकेदारांकडून सदर योजनेचे काम संथ गतीने सुरु असून व शासनाचे धोरण प्रति माणसी ५५ लि. प्रति दिन असतानाही रांजणखार-डावली ग्रामस्थांना तीन महिन्यातून एकदाही पाणी ग्रामपंचायतीला मिळत नाही.

एम.आय.डी.सी. व्यतिरिक्त गावाला पाण्याचा इतर कोणताही स्रोत उपलब्ध नाही. या योजनेचे पाणी इतर गावातील धनदांडगे, उद्योगपती यांच्या बंगल्यांना देत असून ज्या गावांसाठी ही योजना राबवण्यात आली त्या गावांना मात्र पाण्यासाठी वणवन हिंडावे लागत आहे. सदरील गावात २० रुपये २० लि. प्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे, मग सरकारच हर घर जल धोरण गेले कुठे असा सवाल करत रांजणखार-डावली ग्रामस्थांकडून उग्र आंदोलन करण्यात आले.