अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
महिलांच्या सक्षमीकरणाठी शासन प्रयत्न करीतच आहे. मात्र शासनाबरोबर पोलिस यंत्रणा पत्रकार, समाज सेवक , राजकीय व्यवस्था या सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची, योगदानाची योग्य दखल घेऊन, त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या या सोहळ्याला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर उपस्थित होते.महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या मोनिका औचटकर, कलाक्षेत्रातील अंकिता राऊत, क्रीडाक्षेत्रातील प्रियांका गुंजाळ, सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखवणाऱ्या मिनल राणे, तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत रुचिका शिर्के यांना पुरस्कार देण्यात आला.