अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमूलकुमार जैन):-
पोलादपूर तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत वाकण हद्दीतील खांबेश्वरवाडी येथे राहणाऱ्या शेती व शेती पूरक व्यवसाय करणाऱ्या म्हामुण जोगीलकर यांच्या गुरांच्या गोठ्याला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वणव्यामुळे आग लागली आहे… ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती जोगीलकर यांना दिली… मात्र घरापासून साधारणत ५०० ते ६०० मीटर अंतरावर गुरांचा गोठा असल्याने वणव्यामुळे लागलेल्या आगीत जोगीलकर यांच्या गोठ्यात असणाऱ्या दोन गायी, दोन वासरे, ३००० पेंडे जळून खाक झाले… यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे समजते… आपल्या गोठ्यातील गुरांना पोटच्या पोरांसारख्या सांभाळणाऱ्या जोगीलकर कुटुंबियांनी गोठ्यातील गुरे डोळ्यासमोर जळताना पाहून एकच हंबरडा फोडला… काळाने घात केला, ज्या गाईंच्या दुधावर घरात उत्पन्न येत असे त्याच गाईंची डोळ्यासमोर राख झाली… त्यामुळे या कुटुंबीयांवर आर्थिक संकट निर्माण झाले असून समाजातील दानशूर व्यक्तींनी म्हामुण जोगीलकर यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन सर्वच क्षेत्रातून होत आहे…