अलिबाग तालुक्यातील चाैल-आग्राव रस्ता खड्डेमय… रस्ते दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…  

0
30

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवटेकर):- 

अलिबाग तालुक्यातील चाैल-आग्राव रस्ता गेली अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. राज्यभरातील भाविकांची श्रद्धा असलेल्या श्री शीतला देवीची मंदिर याच मार्गावर आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांनाही खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी आंंदोलनाची तयारी केली आहे.

अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांनी अद्यापही दुरवस्था आहे. यातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तर काही ग्रामपंचायत अखत्यारित आहेत. तालुक्यातील चाैल-आग्राव या मार्गाची अवस्था सध्या अतिशय दयनिय झाली आहे. गेली अनेक वर्षे हा रस्ता नादुरुस्त आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून रस्त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे दररोज प्रवास करताना या मार्गावरील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले शीतला देवीचे मंदिर आहे. दररोज या मंदिरामध्ये हजारो भाविक- पर्यटक भेट देत असतात, त्यांनाही ना दुरुस्त रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

या परिसरातील ग्रामस्थांनी आता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्याची तयारी केली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येईल, प्रसंगी रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.