पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर) :-
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाविषयी कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही म्हणून रायगड जिल्ह्यातील विनोबाजींच्या जन्मगाव गागोदे बुद्रुक येथे रस्त्यावर शाळा भरून शिक्षण हक्क सत्याग्रह करण्यात आला…
सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण केल्यामुळे आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ३०० शाळा बंद झालेल्या आहेत आणि यावर्षी २६ शाळा बंद झालेल्या आहेत…. तसेच शासनाच्या संच मान्यता पत्रक १५ मार्च २०२५ नुसार रायगड जिल्ह्यातील २०० शाळा बंद होणार आहेत… तसेच महाराष्ट्रातील १४०० शाळा बंद होणार आहेत… याचा अर्थ रायगड जिल्ह्यातील ३०० गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागत आहे आणि महाराष्ट्रातील १४००० गावातील मुलांना शिक्षण विकत घ्यावे लागणार आहे…. आज पहिलीच्या मुलांसाठी शैक्षणिक खर्च ३५ ते ४० हजार रुपये, अकरा बारावीच्या मुलांचा शैक्षणिक खर्च २ ते ३ लाख रुपये, एमबीए साठी शैक्षणिक खर्च ५ ते ६ लाख रुपये, इंजिनीयर होण्यासाठी खर्च १२ ते १५ लाख रुपये, डॉक्टर होण्यासाठी ६० ते ७० लाख रुपये खर्च होतो…. आज शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे सर्व समाजातील गोर-गरिबांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली गेलेली आहेत…
आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक, तालुका पेण, जिल्हा रायगड येथे गेल्या वर्षभरापासून सत्यशोधक सर्वोदय संघटनेच्या माध्यमातून शिक्षण हक्क सत्याग्रह सुरु आहे. दिनांक ३० जानेवारी २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत बेमुदत उपोषण करून शिक्षण हक्क सत्याग्रह करण्यात आले होते…. सध्या महाराष्ट्र अधिवेशन काळात काळी फित बांधून सत्याग्रह सुरू आहे…. यात पुढील मागण्यांचा समावेश आहे… सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करुन सर्व समाजाला अंगणवाडी ते पदवी, पदव्युत्तर, पीएचडी, इंजिनीअर, वकील, डॉक्टर, एमबीए वगैरे पर्यंत मोफत शिक्षण दयावे, रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाप्रमाणे बंद केलेल्या 300 शाळा पुन्हा सुरू करून प्रत्येक शाळेत सेमी इंग्लिश सुरू करावे, महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेत सेमी इंग्लिश सुरू करावे, कंत्राटी कामगार कायदा रद्द करून कायमस्वरूपी कामगार कायदा व्हावा, रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी…..
आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक, तालुका पेण, जिल्हा रायगड येथील पालक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सेमी इंग्लिश गागोदे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सुरू केलेले आहे… त्यामुळे शाळेतील पटसंख्या वाढलेली आहे… असा प्रयोग सर्व ठिकाणी केल्यास रायगड जिल्ह्यातील ३०० शाळासह महाराष्ट्रातील सर्व शाळा पुन्हा सुरू होऊ शकतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे….