रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव ) :-
रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गावे, आदिवासी वाड्या-पाड्याना भीषण पाणी टंचाईची झळ जाणवत आहे. पाण्याचा स्त्रोत अपुरा पडत असल्याने महिला वर्गाची दाही दिशा अक्षरश भटकंती सुरू आहे. रोह्यातील कुंडलिका नदी लगतची 26 गावे पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करीत आहेत. यासाठी महिला आंदोलक आक्रमक होऊन, त्यांनी प्रशासनाला जाब विचारत….. आम्हाला पाण्यापासून वंचीत ठेवण्यात आले, याला जबाबदार कोण? कोट्यवधींचा निधी येतो आणि जातो कुठे? प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंत्या करून केराची टोपली दाखवली जाते,आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार,भविष्यात हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशारा संतप्त आंदोलक महिलांनी दिला.
रोहा एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्याने कुंडलिका नदी दूषित झाली असल्यामुळे एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या साह्याने 26 गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली होती. मात्र या वाहिनीवर असंख्य ठिकाणी पाणी चोरी होत असल्याने गेली 14 वर्षे 26 गावे पाण्यापासून वंचित आहेत. मात्र आता पाणी मिळाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका या गावातील महिलांनी घेतली आहे.