मुंबई शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
वसईमध्ये धान्याचा काळाबाजार करणाऱ्या पाच शिधावाटप दुकांनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.या सरकारमान्य दुकानात येणारे धान्य खासगी बाजारात विकले जात होते.वसईतील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या या पाच सरकारी शिधावाटप दुकानदारांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येऊन येथील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…भारतीय खाद्य निगमकडून येणारे धान्य या सरकारमान्य दुकानात न उतरवता ते अन्य ठिकाणी उतरवले जाते असे. याप्रकरणी रास्तभाव दुकान चालविणारे जगदंबा महिला बचतगट, जितेंद्र चव्हाण, श्रमिक महिला बचतगट,आदिशक्ती महिला बचतगट इत्यादींच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणे विरुद्धच्या अधिनियमान्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.याप्रकरणाची कुणकुण लागताच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी मध्ये सरकारी धान्याचा काळाबाजार होत असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ उमराळे येथील दुकान चालक आनंद जैस्वाल, माणिकपूर येथील श्रमिक महिला बचतगट, आदिशक्ती महिला बचतगट, महालक्ष्मी महिला बचतगट व जितेंद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ही परवाना रद्द दुकाने नजिकच्या रास्त भाव दुकानात तात्पुरती जोडली जाणार असून संबंधित शिधापत्रिका धारकांना तेथून धान्य वाटप होईल असे वसईचे पुरवठा निरीक्षक भागवत सोनार यांनी माहिती दिली आहे…