खवसावाडी येथील आदिवासींवर अन्याय सुरूच… रस्ता अभावी उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू…  

0
28

पेण शिवसत्ता टाइम्स (देवा पेरवी):-  

पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खवसावाडी येथे रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हर्षा कन्स्ट्रक्शन यांनी 60 लाखांचा ठेका घेऊन रस्ता पूर्ण केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता… मात्र, प्रत्यक्ष पाहणीअंती या वाडीसाठी कोणताही रस्ता अस्तित्वात नाही, हे उघड झाले आहे… वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही… तसेच उंबरमाळ, केळीचीवाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 25 जानेवारी 2024 मध्ये 7.22 कोटींचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन, वाशी नवी मुंबई यांनी घेतला आहे… मात्र,1 वर्ष होऊन देखील वर्क ऑर्डरची मुदत संपूनही अद्याप काम सुरू झालेले नाही असा आरोप खवसावाडी येथील ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे…

यावेळी पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ऍड.सिद्धार्थ इंगळे, ऍड.विकास शिंदे, नंदकुमार पवार, पाच वाड्यातील ग्रामस्थ प्रतिनिधी यशवंत खाकर, सुनील वाघमारे, काल्या कडू, गीता वाघमारे, पल्लवी खाकर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे राजेश रसाळ, सचिन पाटील यांच्यासह आदिवासी महिला, पुरुष व विद्यार्थी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

जिल्ह्याचा प्रथम प्रशासकीय अधिकारी म्हणून रायगड जिल्हाधिकारी यांनी यावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही… आदिवासींच्या मूलभूत हक्कांचे उघडपणे उल्लंघन होत असताना प्रशासन केवळ डोळेझाक करत आहे… ही निष्क्रियता असह्य असून, या गंभीर प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी सदर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी सांगितले…