रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादात रामदास आठवलेंची उडी… ना. आदितीताई तटकरे ,ना भरतशेठ गोगावले…

0
18

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप काही सुटला नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्री पदावर ठाम आहेत. तसेच मंत्री अदिती तटकरे यांना देखील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवीन तोडगा सांगितला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ( आरपीआई) द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. भरत गोगावले हे पहिले मंत्री पदासाठी आग्रही होते आता पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत असे रामदास आठवले म्हणाले. केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले हे काल रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. माणगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला त्यांनी चवदार तळ्यावर जाण्याआधी भेट दिली. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबत भाष्य केलं. रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्या आरपीआय पक्षाला मिळावं अशी आशा व्यक्त केली. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. तर एकीकडे सुनील तटकरे यांचा रायगडच्या पालकमंत्री पदावरुन मंत्री अदिती तटकरे यांना हे पद मिळण्यासाठी आग्रह सुरू असल्यामुळे हा वाद सुरू आहे. मात्र आता हा वाद सुटत नसेल तर हे पालकमंत्री पद आम्हाला मिळावं अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.