खोपटे गावकऱ्यांचा पाण्यासाठी टाहो… ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा विभाग ठरत आहे सपशेल अपयशी…

0
60

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):- 

आत्तापर्यंत कोट्यावधी रूपये ज्या पाणीपुरवठा योजनेवर खर्च करण्यात आले आहेत…उरण तालुक्यातील त्या खोपटा गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा मात्र ठणठणाट झाला आहे…येथील नागरिकांना सुमारे तीन ते चार दिवस पिण्याचे पाणी नळाला येत नसल्याने आज गावकऱ्यांनी बांधपाडा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला…सदोष पाणी पुरवठा लाईन,चुकीच्या पद्धतीने हाताळणी आणि अवैध नळ जोडन्यांवर ठोस कारवाई करण्यात येत असलेल्या अपयशा मुळे गावात बहुतांशी नागरिकांची पाण्यासाठी बाबाबोंब आहे. गावातील महिलांना सध्या कपडे धुण्यासाठी तर सार्वजनिक तलाव , घरगुती तळ्या आदींचा आसरा घ्यावा लागत आहे. पाण्याचे नियोजनच पुर्णतः चुकीचे झालेले असल्याने गावात पाण्याचे समतोल वाटप होत नाही त्यामुळे मिळतोय त्यांना भरपूर पाणी मिळत आहे आणि नाही त्यांना पिण्यासाठी दोन हंडे देखील नळाचे पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीचा संताप आहे…उरण तालुक्याच्या पुर्व भागातील सधन ग्रामपंचायत म्हणून खोपटा गावाची बांधपाडा ग्रामपंचायत ओळखली जात आहे. सात पाड्यांची मिळून असलेल्या या गावात पाण्याची मागील अनेक दिवसांपासून बोंबाबोंब आहे.

गावाला पाणी पुरवठा करणारी पाणी साठवण टाकी धसखोशी पाड्याजवळ आहे. तिथून सर्व गावाला पानी सोडण्यात येते मात्र त्याचे अंतर एवढे लांब आहे की पाण्याचा मुख्य पाईप भरायलाच पंधरा मिनिटे जातात…त्यानंतर जे पाणी येते ते केवळ पंधरा मिनिटे सुरू राहते त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही… संपूर्ण गावाला एकाच साठवण टाकीतून पाणी पुरवठा होत असल्याने ही समस्या सुटण्यास बाधा होत आहे. त्यासाठी गावाला किमान ३ ते ४ पाणी साठवण टाक्यांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर संपूर्ण गावात नागरिकांना इलेक्ट्रिक मोटर  मशिन्स लावल्याशिवाय पाणीच मिळत नाही त्यामुळे लाईट बिले भरून नागरिकांची अक्षरशा दमछाक झाली आहे. याउपरही नागरिकांना पाणीच मिळत नसल्याने आज संतप्त गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला…ढिम्म प्रशासनाचे पाण्याच्या प्रश्नावर लक्ष वेधले जावे यासाठी गावकरी थेट बेंडबाजा घेऊनच ग्रामपंचायतीवर धडकल्याचे पहायला मिळाले. या गावकऱ्यांचे निवेदन ग्रामसेवक आर व्हि सातंगे आणि प्रशासक प्रियांका पाटील यांनी स्वीकारून पाणी प्रश्नावर सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे…