विरार शिवसत्ता टाइम्स (देवेंद्र मोरे):-
विरार ते सफाळे (खारवाडेश्री) या बहुचर्चित “रो-रो” सेवेचा शुभारंभ आज शनिवार पासून प्रायोगिक तत्वावर करण्यात आला… महाराष्ट्र सागरी महामंडळातर्फे मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग एण्ड मरिन सर्व्हिसेस प्रा. लि. या संस्थेद्वारे ही फेरी बोट सेवा चालविण्यात येणार आहे. यामुळे विरार ते पालघर पर्यंतचा दिड तासाचा प्रवास केवळ १५ मिनीटात साध्य होणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी सडकेने म्हणजे रस्ता मार्गे दिड तास सहज लागतो मात्र आता समुद्र मार्गे हाच प्रवास केवळ १५ मिनीटात करणे शक्य होईल व वेळ आणि इंधन यांची बचत होणार आहे.
वसई, विरार आणि मिरा रोड, भाईंदर शहरांदरम्यान रो-रो सेवा मागील वर्षात सुरू करण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर म्हणजे खारेवाडीश्री अशी रो-रो सेवा आज पासून सुरू झाली आहे. वसई प्रमाणे विरार ते पालघर अशी फेरी बोट सुरू व्हावी यासाठी स्थानिक जनतेची फार मागणी होती, त्यासाठी येथील माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता…