मुंबई शिवसत्ता टाइम्स ( देवेंद्र मोरे ) :-
टाटा आयपीएल-२०२५च्या मोसमात पिछाडीवर राहिलेला “मुंबई इंडियन्स” संघ आता मात्र कात टाकीत एकापाठोपाठ एक विजय मिळवत गुण-तालिकेत अक्षरशः २ऱ्या क्रमांकावर मुसंडी मारतांना दिसतो आहे. काल होम ग्राऊंडवर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर खेळताना आपल्या ६व्या विजयाची नोंद केली.
या सामन्यापूर्वी मुंबईने ९ सामने खेळले पैकी ४ सामने गमावून ५ सामन्यात विजयी झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खात्यावर एकूण १० गुण आधीच जमा होते आणि कालचा लखनौ सुपर जायंट्स संघाबरोबर खेळताना ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला व त्यांचे एकूण १२ गुण झाले. यामुळे मुंबई इंडियन्स संघाने गुण तालिकेतील क्रमवारीत झपकन दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत आनंदोत्सव सुरू केला.
पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही कारण कालच्या दुसऱ्या सामन्यात आरसीबी संघाने दिल्लीवर दमदार विजय मिळवत धावांच्या सरासरीने अव्वल स्थान म्हणजे गुणतालिकेतील प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन संघाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आणि मुंबई इंडियन्स संघाला तिसऱ्या क्रमांकावरच स्थिरावणे भाग पडले यामुळे मुंबई इंडियन्स संघ आणि मुंबई क्रिकेट शौकीनांना आपल्या उत्साहाला थोडी मुरड घालावी लागली.