माणगावच्या स्वस्त धान्य दुकान क्र.०१ मध्ये सकारात्मक बदल; शिधापत्रिकाधारकांना दिलासा…

0
17

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):–

अनेक वर्षांपासून माणगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्र. ०१च्या अकार्यक्षमतेमुळे स्थानिक शिधापत्रिकाधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या दुकानावर सुमारे ४०० शिधापत्रिकाधारक अवलंबून असूनदेखील, धान्य वितरणातील अनियमितता, अचानक बदल, दीर्घ रांगा आणि तारीख व वेळांबाबत सततचा गोंधळ यामुळे नागरिक हैराण झाले होते.

दुकानाचे वेळोवेळी बदलणारे व्यवस्थापन, अपुरी व अनियमित माहिती, तसेच पारदर्शकतेचा अभाव यामुळे अनेक वेळा लाभार्थ्यांना त्यांच्या योग्य हक्काचे धान्य मिळाले नाही. अनेकदा तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर देखील दुकान बंद असल्यामुळे किंवा सेवा वेळेत न मिळाल्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागे. ही परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, गोंधळच नित्याचाच भाग बनला होता.

या दुकानाचे पूर्वी संचालन एक खरेदी-विक्री सहकारी संस्थेद्वारे केले जात होते. मात्र संस्थेचा कार्यकाळ संपल्यानंतर दुकान प्रशासनाच्या ताब्यात गेले आणि परिस्थिती अधिकच बिघडली. यामुळे नियंत्रणाचा व जबाबदारीचा पूर्ण अभाव निर्माण झाला.

परंतु एका सविस्तर बातमीद्वारे या समस्येवर प्रकाश टाकल्यावर संबंधित शासकीय विभागाने तत्काळ दखल घेतली. अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानाची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि उच्च अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. यानंतर त्वरीत कृती करण्यात आली.

समस्येच्या उपाययोजनेसाठी स्वस्त धान्य दुकान क्र. ०५ ला दुकान क्र. ०१ चे अतिरिक्त व्यवस्थापन देण्यात आले. तसेच वितरण केंद्र नवीन ठिकाणी – खांडद, माणगाव येथे हलवण्यात आले. या बदलानंतर स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.

नवीन व्यवस्थापनाखाली, गेल्या पाच वर्षांत प्रथमच धान्य वितरण महिन्याच्या शेवटी १० दिवस आधीच सुरू झाले. शिधापत्रिकाधारकांना आता ठराविक वेळेत, नियमित व पूर्ण कोट्यात धान्य मिळू लागले आहे. तसेच स्वच्छ व ताजे धान्य दिले जात असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. २५ एप्रिल २०२५ पर्यंत सुमारे ४०० पैकी ३५० लाभार्थ्यांनी आपले धान्य प्राप्त केले असून, उर्वरित नागरिकांनाही २८ एप्रिलपर्यंत धान्य मिळण्याची अपेक्षा आहे.

या सकारात्मक बदलाचे श्रेय नविन नियुक्त अन्न वितरण अधिकारी श्री. राहुल शितोळे यांना दिले जात आहे. त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळेच संपूर्ण वितरण व्यवस्थेत शिस्त व कार्यक्षमता निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत असून, दीर्घकाळानंतर स्थानिक नागरिकांना खरा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.