सुट्टीच्या दिवशी प्लास्टिक कचरा पेटविण्याचा रिवाज कायम… हाळ खुर्द ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात ?

0
16

खालापूर शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-

खालापूर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक ग्रामपंचायतमधील रस्त्यांवर…नदी-नाल्यालगत,डम्पिंग ग्राउंडमध्ये सुट्टीच्या दिवशी कचरा पेटवून देण्याचा रिवाज अजूनही कायम आहे… रविवार, 5 मे रोजी हाळ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल युके रिसॉर्टलगत रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्याने साठलेला कचरा सुट्टीच्या दिवशी जाळण्यात आला होता. या प्लास्टिक कचऱ्याने पेट घेतल्याने अगीचा मोठा डोम उसळला होता. आकाशात पोहचत काळा धूर व भयानक वासामुळे गावातील लोकांना आपल्याच घरात लोकांना गुदमरल्यासारखे होत होते, वारंवार कचरा पेटवून दिले जात असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आधीच दिवसभर महाभयानक उष्णतेच्या लाटा वाहत असतांना जीव लाहीलाही होत असून आता रात्री प्लास्टिक कचरा पेटवून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळले जात असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान,या घटनेविषयी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्रकारांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता साहेबांनी पत्रकारांचा फोन उचलण्याचे कष्ट देखील घेतले नाही. या आधी देखील याच ठिकाणी कचरा पेटविला जात असल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्या आहेत…पत्रकारांनी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत,तरी देखील अनेक ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक कचरा बेशिस्तपणे पेटविला जात असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालण्यात येत आहे. इरसाळवाडी सारखी तालुक्यात एखादी दुर्दैवी दुर्घटना घडली व त्याची माहिती देण्यासाठी या महान लोकसेवकाला फोन केल्यावर फोनचे उत्तर देणार का ? की दुसऱ्या दिवशी न्यूज चैनलवर व वृत्तपत्रात प्रसिद्ध होण्यासाठी आणखी चार लोकसेवकांना घेऊन पाच लाखाची मदत देण्यासाठी येणार ? अशा कामचुकार व बेजबाबदाला लोकसेवकाला निलंबित करण्याची मागणी पत्रकारांसह ग्रामस्थांमधून होत आहे.
प्लास्टिकच्या पिशव्यांनी साठलेला कचरा जाळल्यास तो पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक असतो. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू आणि राख बाहेर पडते, जी हवेची गुणवत्ता बिघडवते आणि श्वसन समस्या निर्माण करते. तसेच, प्लास्टिक जाळल्यास माती आणि पाण्याचे प्रदूषणही होते. प्लास्टिक कचरा वन्यजीवांसाठी धोकादायक असतो, कारण ते त्याला अन्न समजून खातात. प्लास्टिक जाळल्याने बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे दमा आणि अन्य श्वसनविकार वाढू शकतात. प्लास्टिक जाळल्याने बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.प्लास्टिक जाळल्याने बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते. कचरा, प्लास्टिक आणि रंगवलेले किंवा प्रक्रिया केलेले लाकूड यासारख्या प्रतिबंधित वस्तू जाळणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे, कारण या पदार्थांमुळे विषारी रसायने बाहेर पडतात जी हवा प्रदूषित करतात. प्रदूषित हवा मानव आणि प्राणी श्वासाद्वारे घेऊ शकतात आणि माती, पृष्ठभागावरील पाण्यात आणि वनस्पतींवर जमा होऊ शकतात.

प्लास्टिक कचरा पेटविणे घातक असतांना देखील या लोकसेवकांना जनता जनार्दनांच्या आरोग्याची कोणतीच काळजी राहिलेली नाही का ? हाळ खुर्द ग्रामपंचायतीने याच महामार्गांलगत लाखो रुपये खर्च करून विटाचे बांधकाम करून दोन भल्या मोठ्या कचराकुंड्या बांधल्या होत्या. मात्र, काही महिन्याआधी सुट्टीच्या दिवशीच जेसीबी मशीनद्वारे तोडून डंपरमध्ये भरून गायब करण्यात आल्या. घंटागाडीत बिघाड झाल्यावर कधी कधी दोन-चार दिवस घंटागाडी येत नसल्याने नागरिकांनी दररोज आपल्या घरातून निघणारा घनकचरा कुठे साठून ठेवावा ? तसेच कुठे टाकावा असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होतो ? ग्रामपंचायतीकडून कोणतीच उपाययोजना होत नसल्याने व कचराकुंड्या नसल्याने हा कचरा कुठे साठवावा ? आधीच कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने नागरिकांची कंबर थोडी त्यातून मात करीत कसे तरी जगण्याचा प्रयत्न करीत असताना थेट रात्री प्लास्टिकचा कचरा पेटवून नवीन आजाराला आमंत्रण देऊन लोकसंख्या कमी करण्यासाठी हा जीव लावून कार्य केला जात आहे का ?असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे…