नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
दिनांक ११ मे रोजी सकाळी ५ वाजता नेरळ पोलिस ठाण्यात गौरक्षकांनी माहिती दिली की दामत गावात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल सुरू आहे… या तक्रारीनुसार खातरजमा करण्यासाठी नेरळ पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबतच गौरक्षक कार्यकर्ते देखील गावात पोहोचले. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि गौरक्षकांमध्ये बाचाबाची होऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या घटनेनंतर दुपारी १२.१५ वाजता दामत गावातील प्रतिष्ठीत नागरिकांसोबत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, गावचे सरपंच जाबीर नजे, सरफराज नजे, जलील नजे, सरफराज टिवाळे, अजगर खोत, साजीद नजे, शादाब नजे हे उपस्थित होते. बैठकीत विक्रम कदम यांनी गावातील नागरिकांना अवैध कत्तल थांबविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. गावकऱ्यांनी देखील भविष्यात कोणतीही अवैध कत्तल होणार नाही, असा ठराव करून अश्वासन दिले.
तसेच संध्याकाळी गौरक्षक आणि हिंदू समाजातील वकील दीपक गायकवाड, ओमकार भडसावळे, विशाल साळुंखे यांच्यासह अन्य प्रतिष्ठीत नागरिकांची स्वतंत्र बैठक झाली. यामध्ये दोन्ही समाजांनी संयम बाळगावा व शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दामत गावात तसेच नेरळ कुंभारआळीतील धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. गावात सध्या शांतता असून प्रशासन सतर्क आहे.