खोपोली शहरात एकेरी वाहतूक सुरू… सूचना,हरकतींची वाट न पाहता पोलिसी बळाचा वापर…

0
10

खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):- 

खोपोली शहरात वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषद प्रशासनाकडून खोपोली बाजारपेठ परिसरात एकेरी वाहतुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अधिसूचना जारी केल्यानंतर 30 दिवसांत लेखी स्वरूपात हरकती व सूचना सादर कराव्यात, त्यानंतर या वाहतूक नियमाची अमंलबजावणी करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु अधिसूचना जारी झाल्यापासून 10 दिवस उलटत नाही, तोच आज शनिवार, 17 मे 2025 पासून खोपोली शहरात एकेरी वाहतूक नियमनाची अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ही अमंलबजावणी नसून ट्रायल आहे, असे पोलिसांनी सांगितले.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. यानंतर लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील सर्व संस्थाने रद्द करीत त्यांना भारत देशात सामावून घेतले. त्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहीली आणि 26 जानेवारी 1950 पासून भारत देश प्रजासत्ताक म्हणून गणला जावू लागला. पण आज 76 वर्षानंतर संपूर्ण खोपोली शहराला प्रश्न पडला आहे की, खरंच खोपोली शहर लोकशाही देशात अथवा राज्यघटना मानली जाणाऱ्या देशात आहे का ? 30 डिसेंबर 2023 रोजी खोपोली नगर परिषदेची मुदत संपली आणि प्रशासकाच्या हातात शहराचा कारभार आला. त्या दिवसापासून खोपोली शहरात हुकूमशाही… राजेशाही सुरू झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासक मनमानीपणे वागत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. आज पुन्हा ते अधोरेखित झाले आहे. खोपोली शहरातील नागरीक, नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या मताला शून्य किंमत देत प्रशासक डॉं. पंकज पाटील यांनी पोलिसी बळाचा वापर करीत एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठिकठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करीत आज एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यात आली. अचानक सुरू करण्यात आलेल्या नियमामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली. खालची खोपोली कमानी जवळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते, हे कर्मचारी खोपोली पोलिस स्टेशनकडे वाहन धारकांना पाठवित होते. अरूणा बार शेजारील रस्त्यांवर देखील दोन महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिपक हॉटेल चौक, डिजी 1 येथे ही पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते आणि ते वाहन धारकांना नव्या मार्गांने पाठवित होते.

खोपोली नगर परिषद बरखास्त झाल्यापासून प्रशासक खोपोली शहराचा कारभार पाहत आहेत. मनमानीपणे निर्णय घेत खोपोलीकरांना त्रास देण्यात आला आहे. त्यात आता एकेरी वाहतूक व्यवस्था राबवित खोपोलीकरांना बंदीस्त करण्यात येत आहे. नव्या नियमनामुळे खोपोली करांना मनस्ताप होणार असला तरी याकडे नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी,भावी लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. खोपोली शहरात एकेरी वाहतुकीमुळे ज्या वाहन धारकांना त्रास होणार आहे, ते वाहनधारक मतदार नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

खोपोली नगर परिषद निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपली आहे, अशा परिस्थितीत आजी-माजी व भावी लोकप्रतिनिधी, नेते एकेरी वाहतूक व्यवस्थेबाबत आवाज का उठवत नाहीत ? असा प्रश्न खोपोली करांना पडला आहे. एकेरी वाहतूक व्यवस्था संपूर्ण खोपोली शहरातील नागरीक व नेते, लोकप्रतिनिधी यांना मान्य आहे का? प्रशासक यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, असे सर्व खोपोली करांना वाटत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. एकाही नागरीक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, नेते, लोकप्रतिनिधी यांनी एकेरी वाहतूक व्यवस्थेबाबत हरकत घेतलेली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खोपोली बाजार पेठेमध्ये एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यास आज संध्याकाळपासून सुरूवात झाली. याबाबत पत्रकारांनी सोशल मिडीयावर मेसेज केल्यावर खोपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी पत्रकार यांना फोन करून हा असा मेसेज का केला असा प्रश्न विचारला. हा पोलिसी बळाचा वापर नसून उद्या प्रत्यक्षात वाहतूक व्यवस्था राबविण्यात आल्यानंतर काय काय अडचणी येवू शकतील, याची ट्रायल घेण्यात आली, असे सांगण्यात आले.

दरम्यान,अद्याप हरकती व सूचना यांना वेळ असतांना तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा एवढा भार असतांना एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यासाठी त्यांना कामाला लावणे, इतके आवश्यक आहे का ?  खोपोली शिळफाटा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित असतांना बाजार पेठेमधील एकेरी वाहतूक व्यवस्था राबविण्यावर भर का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खोपोली पोलिस प्रशासनाला नवीन वाहतूक व्यवस्था राबविण्यासाठी रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी किंवा रायगड जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची गरज नाही का? की पोलिस निरीक्षक निर्णय घेत आपल्या मनाने वाहतूक व्यवस्था राबवू शकतात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.