महाराष्ट्र राज्यातील १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी.नुकसानभरपाई मिळणार नाही….आदेश जारी…

0
29

उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-

महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ व सुधारणा अध्यादेश,२०२१ अन्वये यावर्षी दि.१ जून ते ३१ जुलै 2025 (दोन्ही दिवस धरून ६१ दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे…बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी केले.

या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करून मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील. सदर पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि. १ जून २०२५ पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि.३१ जुलै त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण / मार्गदर्शक सूचना / आदेश लागू राहतील.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन १२ सागरी मैलापर्यंत ) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), २०२१ च्या कलम १४ अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करणारे यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिद्ध आहे.तरी सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांनी सदर प्रसिध्दी निवेदनाची नोंद घेवून विहीत बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी अशी मत्स्यव्यवसाय विभागावाकडून कळविण्यात आले आहेत.