बेलीवाडी आदिवासी वाडी व कळंबसुरेत मुसळधार पाऊस… मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान…

0
11

अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-

रायगड जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या पावसामुळे उरण तालुक्यातील बेलीवाडी आदिवासी वाडी व कळंबसुरे येथे पावसामुळे घराचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून कळंबसुरे गावात दोन जण जखमी झाले असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भ्रमणध्वनी द्वारे दिली आहे.

काल दुपारपासून पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात दैना उडवली असून काही ना बेघर केले असल्याची घटना घडली आहे…उरण तालुक्यातील सारडे विभागात असलेल्या बेलवाडी आदिवासीवाडी ही दोन ते अडीच किलो मीटर लांब असून तिथे कोणत्याही प्रकारचे वाहन जात नसल्याने पायी चालत जावे लागते.या आदिवासी वाडीवर पंधरा ते अठरा कुटुंब राहत असून त्यातील सात ते आठ घरे ही घरकुल योजनेतील आहेत.या ठिकाणी पन्नासच्या आसपास लोकवस्ती असून एक महिला ही गर्भवती असल्याची माहिती उरण तहसील कार्यालय कडून प्राप्त झाली आहे.येथील दहा घरे मातीच्या भिंती असलेली कच्ची घरे होती. ही घरे पावसाच्या जोरामुळे भिंती पडून नुकसान झाले… मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. आज सकाळी उरण तहसीलदार यांच्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी केशव मोहिते आणि त्यांचे पथक हे सकाळी लवकर आदिवासी बांधवांना नाश्ता पाणी घेऊन गेले आहेत. त्यांना विनंती करून त्यांना काही अंतरावर असणाऱ्या सारडे येथील रायगड जिल्हा परिषद मालकीच्या शाळेत हलविण्याची विनंती करून हलविण्यात येणार आहे.तहसीलदार डॉ उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सारडे मंडळ अधिकारी केशव मोहिते,तलाठी सुभाष पवार ,जयहिंद कोळी,खूपसे व सर्व कोतवाल व आपदा मित्र, पोलिस पाटील हे करीत आहेत.

उरण तालुक्यातील जुई तलाठी सजाच्या अंतर्गत असणाऱ्या कळंबसुरे येथे शंभर सव्वाशे घराचे पत्रे, कौले तसेच इतर प्रकारचे नुकसान झाले असून अभिषेक अनंता जाधव( वय २४वर्षे) ह्याच्यासहित एक महिला देखील जखमी झाली आहे.जुई तलाठी सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नुकसान झालेल्या घराचे पाहणी व पंचनामा सुरू असून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीचा आकडा प्राप्त होईल अशी माहिती तहसीलदार डॉ उद्धव कदम यांनी दिली आहे…