माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
यंदाचा मे महिना पारंपरिक उकाड्याच्या ऐवजी वेगळ्याच रूपात समोर आला.सामान्यतः उन्हाच्या कडाक्याने होरपळणारा हा महिना यावेळी गडद ढगांनी आणि पावसाच्या सरींनी व्यापलेला दिसला.८ मेपासून माणगाव परिसरात पावसाची सुरुवात झाली आणि नंतर अधूनमधून पडणाऱ्या सरींनी वातावरण आणखीनच दमट आणि गूढ केलं. विशेषतः २० ते २७ मेदरम्यान तर हवामानानेच आपला रंगच बदलून टाकला.या आठवड्यात संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण, अंधुक उजेड आणि सततच्या पावसाने अधिराज्य गाजवलं. २५ ते २७ मे या तीन दिवसांत आकाश इतकं गडद होतं की दुपारीसुद्धा संध्याकाळसारखं वाटायचं… प्रकाश जणू हरवल्यासारखा होता… हवामानतज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती मान्सूनपूर्व हालचाली, स्थानिक हवामानातील गोंधळ आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळसदृश स्थितीमुळे निर्माण झाली… मात्र, आजचा दिवस थोडा वेगळा ठरला… ढगांचं आवरण थोडंसं विरळ झालं आणि सूर्याने मळभातून क्षणभर डोकावलं… तो नेहमीसारखा तेजस्वी आणि तापदायक नव्हता, पण त्याच्या सौम्य प्रकाशाची झुळूकही पुरेशी होती मनात उमेद जागवण्यासाठी… लोक घराबाहेर आले, आकाशाकडे पाहिलं आणि त्या प्रकाशाच्या झळकेला शांत अभिवादन केलं… जणू निसर्गानं एका आठवड्यानंतर उजेडाची आठवण करून दिली… मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात, मान्सूनपूर्व पावसामुळे निर्माण झालेलं हे वेगळंच हवामान आणि त्या पार्श्वभूमीवर दिसलेली सूर्यकिरणांची ही झलक, निसर्गाच्या बदलत्या रूपांची आठवण करून देणारी होती… काळोखाच्या साम्राज्यातून आशेचा उजेड झिरपतो, हे आजच्या दिवसाने पुन्हा एकदा दाखवून दिलं…