माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगावमधील खांदाड कालवा,जो कधी काळी शेतजमिनींसाठी जीवनदायिनी ठरला होता,आता वाहतुकीच्या नव्या दिशेने मार्गक्रमण करत आहे…दक्षिण रायगडमधील माणगाव हे शहर मुंबई-गोवा महामार्गावरील (NH-66) एक महत्त्वपूर्ण दळणवळण केंद्र मानले जाते…शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती वाहतूक यामुळे येथे सध्या गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे…राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (NHAI) बायपास रस्ता तांत्रिक कारणामुळे अपूर्ण राहिल्याने या समस्येला आणखी बळकटी मिळाली…या पार्श्वभूमीवर, NH-66 च्या पश्चिम बाजूने असलेल्या कालव्याचा मार्ग रस्त्यामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे…कालव्याचे अस्तित्व शहरीकरणामुळे लोप पावत असतानाच,त्याचा पुनर्विकास करत वाहतुकीसाठी वापर करण्याचा हा उपक्रम हाती घेतला गेला आहे.
सध्या या मार्गावर मोऱ्यांचे बांधकाम आणि रस्त्याचे दुपदरीकरण युद्धपातळीवर सुरू असून,यामुळे शहरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल,असा अंदाज आहे…हा नवीन रस्ता वॉर्ड क्र.12 येथील स्वस्तिक कॉम्प्लेक्सजवळ विरुद्ध बाजूने सुरू होऊन बामणोली रस्त्याला वळतो आणि वॉर्ड क्र.15 मधील पवार वाडा मार्गे मोरबा रस्त्याला मिळतो…यामुळे मोरबा, दापोली,म्हसळा व श्रीवर्धनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एक थेट व सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे…त्याचबरोबर पुण्याकडून येणाऱ्या पर्यटकांची वाहने निजामपूर रोड कॉर्नरमार्गे जुन्या बामणोली रस्त्यावर वळविल्यास, मुख्य बाजारपेठेवरील ताणही मोठ्या प्रमाणावर कमी होईल. “शेतीच्या कालव्याला वाहतुकीचा राजमार्ग” ही संकल्पना माणगावच्या नागरीकांसाठी दिलासादायक आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणारी ठरणार आहे…