स्वच्छतेकडे दुर्लक्ष! खांदड वॉर्ड १५ मध्ये नाल्याच्या कचऱ्याची आठवडाभर वाटचाल; दोन महिन्यांपासून पडलेला कचरा प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण…

0
9

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

नगर पं. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहीम हाती घेतली असून, शहरातील अनेक वॉर्डांत नाल्यांची साफसफाई सुरू आहे. कचरा बाहेर काढल्यानंतर लगेचच तो कचऱ्याच्या वाहनात भरावा असा संकेत असला, तरी वॉर्ड क्रमांक १५ मधील खांदड येथील माहेर मॅटर्निटी हॉस्पिटलजवळ ३ जून २०२५ रोजी साफसफाई केल्यानंतर काढलेला कचरा आज आठवडाभरानंतरही रस्त्याच्या कडेला पडून आहे.

या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, त्यावर गवत व झुडपं उगम पावत आहेत. हा रस्ता वॉर्ड १५ आणि वॉर्ड १६ मधील नागरिक सतत वापरत असल्याने ही स्थिती आरोग्यासाठी गंभीर ठरत आहे. नाल्याच्या सफाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी केवळ काही भाग स्वच्छ केला आणि उर्वरित कचरा उचलण्याची जबाबदारी दुसऱ्या पथकावर टाकली गेली. मात्र, आठवडाभरानंतरही हे पथक पोहोचलेले नाही, हे ढिसाळ नियोजन दर्शवते.

याच पार्श्वभूमीवर एक गंभीर उदाहरण म्हणजे, वॉर्ड क्रमांक 16 मधील वालेराव भिमसेन यांच्या निवासस्थानाजवळ १२ एप्रिल २०२५ रोजी पहिल्यांदाच ऐतिहासिक स्वरूपात नाले आणि रस्त्याची सफाई झाली होती. मात्र, त्यावेळी नाल्याबाहेर काढलेला संपूर्ण कचरा रस्त्यालगत टाकण्यात आला आणि आज दोन महिने उलटून गेले तरी तो कचरा अद्याप तसाच पडून आहे. हे माणगाव नगरपरिषदेच्या कामकाजाची मानसिकता स्पष्टपणे दाखवणारे उदाहरण ठरते.

विशेष बाब म्हणजे, हे प्रकार वारंवार घडत असून, गेल्या वर्षीही अशाच स्थितीत पत्रकारांनी लक्ष वेधल्यावरच प्रशासन जागे झाले होते. यंदाही तसाच प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. यावरून आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो – जेव्हा नाल्याची साफसफाई होते, तेव्हा काढलेला कचरा बाजूला ठेवला जातो आणि तो नगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाने नेला जातो. मात्र, ही वाहने बहुधा घरगुती कचरा उचलण्यासाठीच येतात. त्यामुळे ती आधीच भरलेली असतात आणि त्यात नाल्याचा मोठ्या प्रमाणातील कचरा भरता येत नाही. शिवाय, या गाड्यांमध्ये नाल्याचा कचरा उचलण्यासाठी आवश्यक साधने नसतात आणि त्यावर नेमलेले कर्मचारीसुद्धा घरगुती डस्टबिन किंवा थेट घरांमधूनच कचरा उचलण्याच्या सवयीचे असतात. त्यामुळे हा कचरा उचलणे त्यांच्या कामात “अतिरिक्त ओझं” ठरतो. म्हणूनच नागरिकांचा सवाल आहे — प्रशासन केवळ मीडिया लक्ष वेधल्यावरच जागं होणार का? की स्वच्छतेसाठी नियमित, कार्यक्षम आणि जबाबदार यंत्रणा उभी केली जाणार  ?