पेण शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पूर्वीची आयपीएल व आत्ताची रिलायन्स नागोठणे कंपनी परिसरातील प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी मागील 35 ते 40 वर्षांपासून व्यापक स्वरूपाचा लढा सुरू आहे. रिलायन्स नागोठणे कंपनीने प्रकल्प प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्या, अन्यथा आमच्या जमिनी परत कराव्यात असा एल्गार करीत आझाद मैदानावर दि. 11 जून 2025 पासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुन्हा बेमुदत आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड तथा बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, कामगार युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभारले आहे. रिलायन्स नागोठणे कंपनीने कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, अन्यथा आमच्या जमिनी परत कराव्यात तसेच नव्याने निर्माण होणाऱ्या प्रकल्पासाठी होणारा मातीच्या भरावाने आंबा नदी लगत असलेल्या शेतजमिनी व गावातील घरांना महा पुराचा धोका ओढवणार आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई विषयी महत्वपूर्ण निर्णायक बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. आता आरपारची लढाई असून या लढ्यात आपला पाठिंबा दर्शवून आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त, स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र यांनी बहु संख्येने आझाद मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणेचे अध्यक्ष गंगाराम मिनमीने, सचिव राकेश जवके,उपाध्यक्ष रोशन जांबेकर, उपाध्यक्ष कु. कु. पुष्पा पुष्पा (रूपा) भोईर यांनी केले आहे. मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की पूर्वीची आय.पी.सी.एल / व आत्ताची रिलायन्स इंडस्ट्रीज लि. नागोठणे जिल्हा रायगड कंपनी प्रकल्पबाधीत शेतकरी कुटूंबातील प्राधान्य प्रमाणपत्र धारकांस कंपनी प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी आणि नविन प्रोजेक्ट कामात माती भरावाच्या कामाने अंबा नदी लगत असलेल्या तलाठी सजा बेणसे अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनी आणि गावातील घरे यांचे पूर परिस्थिती उद्भवल्या नंतर होणाऱ्या नूकसानी विषयी अंतिम निर्णायक बैठक मा. मुख्यमंत्री यांनी आपल्या अध्यक्षतेत मंत्रालय मुंबई येथे घेण्यात येईल असे उद्योग मंत्री, उदय सामंत महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेत घेतलेली ५ मार्च २०२५ रोजीच्या बैठकीत अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनीधी यांस चर्चा करून आश्वसीत केले होते, तसे बैठकीचे इतिवृत्तांतमध्ये नमूद केले आहे. सदरील प्रकरणी उद्योग विभाग तर्फे पुढील निर्णायक कार्यवाही करिता गॅस २०२४/ प्र. क्रमांक- ४२ (भाग-२)/ उद्योग १० ची नस्ती (फाईल) मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली आहे. आपल्या कार्यालयात विचारणा केली असता फक्त आश्वासने दिली जातात, प्रत्यक्षात निर्णायक बैठक घेणे कामी तारिख, वेळ सूनिश्चीत करण्यात येत नाही. प्रलंबीत प्रश्न मार्गस्त होणे कामी निर्णायक बैठक मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेत घेणे कामी आपल्या कार्यालया मार्फत चाल ढकल होत असल्या कारणास्तव दिनांक ११/०६/२०२५ पासून पुढे आझाद मैदान मुंबई येथे सर्व प्रकल्पबाधीत प्रमाणपत्र धारकांच्या उपस्थितीत आणि अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात बेमुदत आमरण उपोषण करत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अध्यक्षतेत निर्णायक बैठक घेऊन प्रकल्पबाधीत प्रमाणपत्र धारकांचा कायमस्वरूपी नोकरी संदर्भात न्याय करावा अशी जोरदार मागणी रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.