बकरी ईदच्या दिवशी 500 गोवंश हत्या होणार असल्याची चर्चा… नेरळ पोलीसांकडून दोन दिवस दामत गावात सर्च ऑपरेशन…

0
11

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):- 

नेरळ जवळील दामत गावात बकरी ईदच्या दिवशी 500 गोवंश हत्या होणार असल्याची चर्चा गोरक्षकांकडून सुरू होती.मात्र, प्रत्येक घरातील गोवंशाची तपासणी केली असता केवळ 17 गोवंशांना टॅगिंग नसल्याचे आढळून आले.त्यामुळे त्या सर्व 17 गोवंशांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.दरम्यान,काही गोरक्षकांकडून दंगल घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला…मात्र,बकरी ईदच्या दिवशी कोणत्याही गोवंशाची हत्या होणार नाही, याची खबरदारी म्हणून नेरळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्याबाबत रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी नेरळ येथे येऊन नेरळ पोलिसांचे कौतुक केले आहे.

दामत गावात बकरी ईद सणाच्या अनुषंगाने 4 जून रोजी कुर्बानीकरीता पाचशे गोवंशीय जनावरे आणल्याचे गोरक्षक प्रतीक ननावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते…त्यासाठी नेरळ येथे अतिरिक्त पोलीस फाटा पाठवण्यात आला होता. मात्र, या आगोदर दामात येथील सर्व गोवंशीय जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बागुल यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि त्यांना टॅग लाऊन घेण्यात आले होते. त्यांनंतर पोलीसांनी दोन दिवस दामत गावात सर्च ऑपरेशन राबविले असता त्यामध्ये 17 गोवंशीय जनावरे बिना टॅगची आढळून आली होती. त्यामुळे संबंधीतावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परंतु, तरी देखील प्रतिक ननावरे यांचे समाधान न झाल्याने त्याने सहकाऱ्यांसोबत नेरळ पोलीस ठाणे येथे धरणे आंदोलन करण्यासाठी बसले. यावेळी स्थानिक गोरक्षकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे म्हणणे न ऐकता प्रतिक ननावरे आणि त्यांचे सहकारी यांनी कर्जत-बदलापूर महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी या बेकायदेशीर जमावावर सौम्य लाठीचार्ज केला आणि संबंधित तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नेरळ पोलिसांच्या सतर्क भूमिकेमुळे नेरळ परिसरात होणारा दंगलीचा प्रकारही रोखला गेला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता नेरळ पोलीस ठाण्यात येऊन चर्चा केली. तसेच, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. सद्यस्थिती नेरळ परिसरात शांतता असून पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दामत तसेच इतर गावात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्यांविरूद्ध कडक स्वरूपाची कारवाई करण्याच्या सुचना प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना दिलेल्या आहेत.