पर्यावरण दिनाच्या निमित्त स्नेहवर्धिनी सोशल ट्रस्टचा अनोखा उपक्रम…स्नेहवर्धिनी सोशल ट्रस्टकडून शाश्वत विकासासाठी धान्यवाटप उपक्रम…

0
8

रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :- 

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने स्नेहवर्धिनी सोशल ट्रस्टतर्फे एक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम ५ जून रोजी राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी महिलांना शाश्वत उपजीविकेकडे वळवणे हा होता. कृषी विज्ञान केंद्र, रोहा आणि एल्लॅप्पी केमिकल कंपनी यांच्या सहकार्याने डॉ. प्रमोद मारुती मंडवकर, कृषी विस्तार शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, रोहा यांच्या उपस्थितीत ३३ महिलांना भाताचे, ११ महिलांना नाचणीचे आणि ११ महिलांना हळदीचे बियाणे वाटप करण्यात आले. हा उपक्रम केवळ कृषी बियाणे वाटपापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे महिलांना स्वयंपूर्ण आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे प्रवृत्त करण्याचा व्यापक उद्देश होता.आदिवासी महिलांना कृषी क्षेत्रात सक्षम बनवण्याचा हा एक लहान पण परिणामकारक पाऊल आहे. या उपक्रमातून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्याबरोबरच, त्यांच्या पोषणमूल्यांवर आधारित उत्पादनांचा वापर वाढवण्याची संधी निर्माण होईल. नाचणी, हळद आणि भात यांसारखी स्थानिक व पोषणमूल्यांनी परिपूर्ण अन्नधान्ये केवळ आरोग्यासाठी लाभदायक नाहीत, तर त्यांची बाजारपेठेत विक्रीही फायदेशीर ठरू शकते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सहकार्य करणाऱ्या संस्थांचा व दात्यांचा स्नेहवर्धिनी सोशल ट्रस्टने मनःपूर्वक आभार व्यक्त केला.या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन व स्त्री सक्षमीकरण अशा दोन्ही महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करण्यात आला आहे. स्नेहवर्धिनी ट्रस्ट यापुढेही अशा उपक्रमांचे अधिक ठिकाणी आयोजन करण्याचा मानस बाळगतो आहे. स्थानिक आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची साथ दिल्यास, भविष्यातील हवामान बदलांना समर्थपणे सामोरे जाण्याची त्यांची क्षमता वाढू शकेल.