रायगड शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
दि. १९ जून २०२५ रोजी उरण, रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक उत्साही वातावरणात पार पडली… पनवेल तालुक्यातील शेलघर येथे स्व. जोमा नारायण घरत समाज सभागृहात गुरुवारी दि. १९ जून २०२५ रोजी झालेल्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व कोकण विभागाचे प्रभारी यू. बी. व्यंकटेश आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एमपीसीसी) सचिव राजेश शर्मा यांनी उपस्थिती लावली. रायगड जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे व सध्याच्या राजकीय आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी प्रभावी रणनीती आखणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
व्यंकटेश यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावर उपस्थित राजेश शर्मा, राणी राय, किरण बडगे, श्रद्धा ठाकूर, मिलिंद पडगांवकर, महेंद्र ठाकूर, जे. डी. जोशी, नाना म्हात्रे, मार्तंड नकवजी, एकता ठाकूर आणि रेहाना अन्सार यांसह इतर सर्व मान्यवरांचे स्वागत केले व त्याचबरोबर सभागृहात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनाही उद्देशून शुभेच्छा दिल्या.
व्यंकटेश यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य संग्रामातील काँग्रेस पक्षाच्या अग्रणी भूमिकेपासून स्वातंत्र्योत्तर काळातील लोकशाही मूल्ये जपण्याच्या पक्षाच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या लोककल्याण व देशसेवेच्या ध्येयाचा उल्लेख करून पक्षाची मुलभूत तत्त्वे स्पष्ट केली. तसेच, व्यंकटेश यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख करून संविधानाची रक्षा व विशेषतः ओबीसी आणि इतर उपेक्षित समाजघटकांचे हक्क सुरक्षित करण्याचे आवाहन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करून त्यांनी महिला आरक्षणासह महत्त्वाची आश्वासने अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणले. सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या माहितीच्या प्रचाराद्वारे जनतेची फसवणूक केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव तथा रायगड जिल्हा निरीक्षक राजेश शर्मा यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र राहावे, सक्रीय राहावे व सामाजिक माध्यमांद्वारे सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पर्दाफाश करावा, असे आवाहन केले. त्यांनी आश्वासन दिले की, पक्षाचे राज्य नेतृत्व जिल्हास्तरीय कार्यक्रम, निवडणुका व युतीसंबंधी स्वायत्त निर्णय घेण्यास सहकार्य करेल. यावेळी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जालना येथे ओबीसी परिषद आयोजित केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अशाच कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “रस्ता खूप लांब आहे, मंजिल खूप कठीण आहे, पण तरी चालणे अत्यंत आवश्यक आहे,” असे यू. बी. व्यंकटेश यांनी सांगून आपले भाषण आटोपते घेतले.
कार्यक्रम संपल्यानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसतर्फे आयोजित ५०० झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस पक्ष सचिव तथा कोकणाचे केंद्रीय प्रभारी मा. यू. बी. व्यंकटेश यांच्या हस्ते रोप लावून शानदार सुरुवात करण्यात आली…