माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
श्री जैन संघ माणगाव यांच्यावतीने यंदा पर्युषण महापर्व मोठ्या श्रद्धा,भक्तिभाव व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. ।। श्री महावीराय नमः ।। या मंगल उद्गारांसह धर्मप्रेमी श्रावक व श्राविका यांनी दैनंदिन कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
दिनांक २० ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित कार्यक्रमांत प्रातः ६ ते ७ प्रार्थना, सकाळी ८:१५ ते ९:३० प्रवचन, दुपारी २:३० ते ३:३० तत्व चर्चा, रात्री ७ ते ८ प्रतिक्रमण आणि रात्री ८:४५ ते १०:३० प्रवचन असे आयोजन करण्यात आले होते.
या काळात विविध दिवस विशेषरूपाने पाळले गेले…२० ऑगस्ट : खाद्य संयम दिवस, २१ ऑगस्ट : स्वाध्याय दिवस, २२ ऑगस्ट : सामायिक दिवस, २३ ऑगस्ट : वाणी संयम दिवस, २४ ऑगस्ट : अणुव्रत चेतना दिवस, २५ ऑगस्ट : जप दिवस, २६ ऑगस्ट : ध्यान दिवस, २७ ऑगस्ट : भगवती संवत्सरी महापर्व व २८ ऑगस्ट : क्षमापना दिवस. संवत्सरी हा जैन धर्मातील सर्वात मोठा व पवित्र पर्व मानला जातो. या दिवशी जाणून–बुजून किंवा नकळत घडलेल्या चुका, कटु वचने किंवा वर्तनाबद्दल सर्वांकडून क्षमायाचना केली जाते. “मिच्छामी दुक्कडम्” आणि “खमतखामना” या प्राकृत उद्गारांद्वारे जैन समाज एकमेकांकडून व सर्व जीवांकडून क्षमा मागतो. यामध्ये आत्मशुद्धी, सद्भाव, बंधुभाव व नव्या जीवनप्रवासाचा संकल्प अंतर्भूत आहे.
त्यामुळे श्री जैन संघ माणगाव यांच्या माध्यमातून साजरा झालेला हा पर्युषण महापर्व व क्षमावाणी उत्सव केवळ धार्मिक मर्यादेत न राहता संपूर्ण समाजाला क्षमाशीलता, मैत्री आणि आत्मशुद्धीचा महान संदेश देणारा ठरला.