केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा पत्रकारांच्या आंदोलनाला पाठिंबा…पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेने दिले निवेदन…

0
5

पनवेल शिवसत्ता टाइम्स (दीपक कांबळे):- 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही महिने शिल्लक राहिले असताना अद्याप विमानतळाच्या नामकरणाची अधिकृतपणे घोषणा केंद्र सरकारने केली नाही. परंतू प्रकल्पग्रस्तांनी दैवत मानलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जावे या मागणीसाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने येत्या २६ सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानिमित्ताने पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या समन्वयक व कमिटीने केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची मुंबई येथील नंदगीरी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी आठवले यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना तात्काळ फोन करून याबाबत जनभावनेचा आदर करून तसेच पनवेलच्या पत्रकारांची भूमिका समजावून सांगितली.

रायगड व ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका आणि जिव्हाळ्याच्या या विषयावर राज्य सरकारने सुद्धा पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारकडे मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र या विमानतळाच्या उदघाटनाच्या वावड्या उठू लागल्या तरी केंद्र शासनामार्फत दिबांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आली नाही. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल तालुक्यात उभे राहिले आहे. त्यामुळे येथील जनतेने विकासाच्या दृष्टीने आपली कसत असलेली जमीन विमानतळाला दिली. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने विकासात कोणताही अडसर आणण्यात आला नाही, त्यामुळे विमानतळाला स्व. लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव केंद्र शासनाने जाहीर करावे यासाठी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने येत्या २६ सप्टेंबर रोजी सिडको कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले साहेबांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्यावतीने जेष्ठ पत्रकार विजय कडू, जेष्ठ पत्रकार सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, केवल महाडिक, शंकर वायदंडे, गणपत वारगडा, भूषण साळुंखे, विशाल सावंत, लालचंद यादव, सुनील पाटील, शैलेश चव्हाण, दिपक घरत, राम बोरिले, आण्णासाहेब अहेर, चंद्रकांत शिर्के, गौरव जहागीरदार आदी उपस्थित होते.